राष्ट्रीय संत श्री समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील महत्त्वाचे संत. एक वेगळीच सामाजिक दृष्टी असलेले समर्थ रामदास महाराष्ट्राच्या तनामनात रुजलेले आहेत. प्रपंच नेटका केल्याने परमार्थ साधता येतो असा उपदेश करणारे रामदास स्वामी प्रत्येक मराठी मनात स्थिरावलेले आहेत. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेच्या ग्रंथदालनात श्री समर्थांवर आणि समर्थांच्या साहित्यकृतींवरील महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आहे. अभ्यासक, साधक, विद्यार्थी, वाचक अशा सर्वांना अभिरुचिसंपन्न करणाऱ्या या ग्रंथसंपदेचा परिचय करून देत आहोत.
ग्रंथराज दासबोध
रामदासस्वामींचे चरित्र, कार्य आणि ग्रंथसंपदा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं अखंड कार्य करणाऱ्या सुनील चिंचोलकर यांनी विवरण केलेला ‘ग्रंथराज दासबोध’ हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून अत्यंत उपयुक्त आणि मागदर्शक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री समर्थ चरित्र
समर्थांचे अलौकिकत्व डोळस पद्धतीने सांगणारे आळतेकर लिखित ‘श्रीसमर्थ चरित्र’ अतिशय अभ्यसनीय आहे. समर्थांच्या कार्याची त्यांनी सखोल चिकित्सा केली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
समर्थ दर्शन
१९८२ मधे श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या महानिर्वाणास ३०० वर्षे पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने रामदासस्वामींवरील लेखांचा हा चिकित्सक ग्रंथ निर्माण केला गेला. मुद्गल, कावळे आणि अनिरुद्ध कुलकर्णी या तीन लेखकांनी या ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथाला समर्थभक्त के. वि. बेलसरे यांची प्रस्तावना आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
राजगुरु समर्थ रामदास
प्रस्तुत ग्रंथात समर्थवाङ्मयाचा व त्यातील विचारांचा संपूर्ण परिचय करून दिला आहे. अभ्यासक, विद्यार्थी आणि संतवाङ्मयाचे वाचक अशा सर्वांना प्रस्तुत ग्रंथ उपयुक्त आणि मार्गदर्शन करणारा आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
सामर्थ्ययोगी रामदास
समर्थवाङ्मय हे सर्वाथाने कायमच समाजोपयोगी असणारे असे वाङ्मय आहे. काळानुसार समर्थवाङ्मयाची उपयुक्तता तर जाणवतेच पण उपयुक्तता वाढतेच आहे. सामर्थ्ययोग किंवा समर्थयोग ही रामदासांची विशाल मूलभूत व सारभूत संकल्पना प्रभाकर पुजारी यांना नेमकी निवडता आली, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
श्री रामदासस्वामींचे प्रपंचविज्ञान
प्रपंचविज्ञान यातील प्रपंच या शब्दाचा अर्थ व्यापक आहे. यादृष्टीने प्रपंचात अंतर्भूत होणारे जे राजकारण आहे त्याचा विचार प्रस्तुत ग्रंथात स्वामींच्या वाङ्मयाच्या आधारे केलेला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध
१७ व्या शतकात संपूर्ण भारतात ११०० मठांच्या व्यवस्थापनाच्या आधारे समाजप्रबोधनाचे कार्य समर्थ रामदासस्वामी यांनी केले. आजही ते विचार व्यवस्थापन शास्त्राचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक अशा सर्वांना मार्गदर्शक आहेत याबाबतचे चिंतन प्रस्तुत ग्रंथात केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
मनाचे श्र्लोक
मनाचे श्र्लोक ही स्वामी रामदासांकडून साधकांना लाभलेली अमोल ठेव. त्यात स्वामींच्या जीवनातील अनुभवामृत जसे आहे, त्याप्रमाणे सर्वोच्च वैदिक तत्त्वज्ञान; ही त्यातील महान् बैठक होय. एक-एक श्लोक जसा राम-उपासनेचे वर्णन करतो त्याप्रमाणे साधकाचे बोट धरून तो त्याला विश्वव्यापी रामाचे दर्शन घडवितो. यातील आणखी विशेष म्हणजे स्वामींच्या चरित्राचे दर्शनही त्यात घडते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र धर्म आणि समर्थ
महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याचे विवेचन करून सामर्थ्यांनी हा धर्म कसा वाढीस लावला याचे सुयोग्य विश्र्लेषण करणारे हे पुस्तक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आनंदवनभुवन
आनंदवनभुवन हे जे स्वामींचे अलौकिक काव्य, ते स्वामींचे भविष्यदर्शन होय. त्यात त्यांनी केवळ एकच भविष्य कथन केलेले नाही. भावी काळातील कित्येक टप्पे दाखवले आहेत. अर्थात् स्वामींना बालपणापासून केवळ जनचिंता, विश्र्वचिंता व धर्मचिंताच होती. आनंदवनभुवनातील प्रतिपादनात त्यांनी ‘रामराज्या’चा अर्थात ‘सत्यधर्मा’चा जो भावी काळ व त्यानंतर बदलत जाणारे जे चित्र त्याचे दर्शन विस्ताराने मांडले आहे; हे नि:संशय. ‘रामराज्य’, ‘महाराष्ट्रधर्म’ आणि आनंदवनभुवनात जी एक समान गुंफण आणि तत्त्वज्ञान आले आहे, त्याचा आणि त्यांच्या चरित्राचा धावता आढावा घेणारे दर्शन प्रस्तुतच्या पुस्तकात आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
रामदासांच्या निसर्गरम्य घळी
समर्थांमुळे ज्या ज्या घळी पावन झाल्या त्या सर्व घळींची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती देणारे हे छोटेखानी पुस्तक आहे.