Book Categories


अक्षरारंभ हा हिंदू धर्मियांच्या १६ संस्कारांपैकी एक अत्यंत मौल्यवान असा संस्कार आहे.

अक्षरारंभ  हा हिंदू धर्मियांच्या १६ संस्कारांपैकी एक अत्यंत मौल्यवान असा संस्कार आहे.

अक्षरारंभ हा हिंदू धर्मियांच्या १६ संस्कारांपैकी एक अत्यंत मौल्यवान असा संस्कार आहे . यात बालकाला विद्यार्थी दशेत प्रवेश करण्या आधी बुद्धिदाता गणरायाला वंदन करून श्रीगणेशाय नमः || असे लिहायला शिकवण्यात येते . या संस्कारावरूनच कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करताना श्रीगणेशा केला अशी उक्ती आपल्याकडे प्रचलित झाली.

अशा या शुभारंभाच्या देवतेचे विघ्नहर्ता व सुखकर्ता असलेल्या श्रीगणेशाचे आगमन दरवर्षी आपल्या संस्कृतीत भाद्रपद शुक्ल चतुर्थीला खूप उत्साहात होत असते . गणेशमूर्तीच्या रूपाने गणेशतत्वाची आपण प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार आपल्या मनात , घरात व समाजात प्राणप्रतिष्ठा करत असतो . आपल्या उपासनेनुसार , भक्तिभावानुसार जणू या गणरायाच्या मूर्तीत आपण प्राण भरत असतो . त्यामुळेच प्रत्येकाच्या मनातला गणपती व गणेशोत्सव असाच वेगवेगळ्या शैलीने ,कुणी गणपतीची गाणी म्हणून , कुणी कथा वाचून , कुणी आरत्या गाऊन ,कुणी स्तोत्र पठणाने साजरा करत असतो .

माझ्या मनातला गणेशोत्सव व गणेशभक्ती ही अथर्वशीर्षाशी खूप साधर्म्य साधते . यातील प्रत्येक श्लोकागणिक मी या गणेशमूर्ती व गणेशतत्वाच्या अधिकाधिक समीप जाऊ लागते . गणक ऋषी रचित अथर्ववेदामधले हे लघु उपनिषद असून यात निच्र्तगायत्री छंदातील १० ऋचांचा समावेश आहे . यातील वर्णनानुसार गणेशतत्वामध्ये पंचमहाभूते व परा , पश्यन्ति ,मध्यमा ,वैखरी ही वाणीची चार रूपे , सर्व ग्रहदेवता , सर्व दिशा , उत्पत्ती , स्थिती ,लय या निसर्गदेवता हे सर्व सामावलेले आहे . म्हणूनच यात गणरायाला त्वं प्रत्यक्षम ब्रम्हासि असं म्हणलंय . म्हणजेच गणपती ही देवता साक्षात ब्रम्हस्वरूप आहे . ब्रम्ह निरंजन ,कलंकरहित आहे , ब्रम्ह ही त्रिकालातीत अशी परमशक्ती आहे . त्यात पूर्णत्व आहे . याच ब्रम्हाचे मूर्त रूप श्रीगणेश आहे . या ब्रम्हाचा एकोहं बहुस्याम हा जो संकल्प आहे ,त्यानुसार ब्रह्ममयी असे हे गणेशतत्त्व त्वं मूलाधारस्थितीयोसी नित्यं या वचनाप्रमाणे सृष्टीतील प्रत्येक मानवी शरीरात मूलाधार चक्रामध्ये वास्तव्य करते . ते सुप्तावस्थेत असल्यामुळे सर्वानाच याची जाणीव असतेच असे नाही . ध्यानधारणा , अंतःशुद्धी यामुळे ते जागृत होते . हे आपल्या शरीरातील कुंडलिनी व इडा पिंगला सुषुम्ना नाड्यांचे उगमस्थान आहे . मानवाला या चक्राच्या जागृती मुळे सद्बुद्धी , सुयश ,समृद्धी ची प्राप्ती होते . हे चक्र pelvic plexus या ठिकाणी स्थित असून adrenal gland चे कार्य संतुलित करण्याचे कार्य करते . चार पाकळ्यांच्या या चक्राचा रंग लाल असल्याने , या चक्राच्या संतुलनासाठी गणपती या देवतेला लाल वस्त्र व लाल फुल वाहिले जाते . यासर्वांचा अर्थ गणेशतत्त्वाचा आपल्या मानवीशरीरावर असणारा प्रभाव हा अखंड मानवजातीच्या survival साठी अत्यंत मोलाचा आहे . म्हणूनच गणपतीला कर्ता धर्ता असं संबोधलं जात असावं .

या ब्रह्ममयी गणेशाला ओंकारस्वरूप देखील म्हणलेले आहे . ओंकारस्वरूप गणेशाच्या ठायी वसलेल्या साडेतीन मात्रा म्हणजेच अकार उकार मकार व बिंदू या ओम या अक्षरशक्तीतील एक एक अवस्था आहेत .

१. अकार - संपूर्ण जगरहाटी ज्या जागृत अवस्थेत असते ती हि वैश्वानर अवस्था . यामध्ये श्रीगणेश आहे .

२. उकार - मानवाच्या स्वप्न व कल्पनेतील जगामधली ही तैजस अवस्था आहे . यात श्रीगणेश आहे .

३. मकार - त्वं आनंदमयस्त्वम ब्रह्ममय: ब्रह्ममय आनंदाची प्राप्ती होणारी , ब्रम्हानंदाची साक्षात अनुभूती देणारी ही सुषुप्ती अर्थात ध्यानावस्था आहे . गणपती ही बुद्धीची देवता असल्याने या अवस्थेतील गणेशतत्त्व आत्म्याच्या प्रज्ञानघन अवस्थेशी एकरूप होते . १/२ - ओम वरील बिंदू असलेली ही अर्धी मात्रा आहे . अ उ म चा उच्चार होतो परंतु या बिंदुला उच्चार नाही . ही तुर्यावस्था म्हणजेच समाधीअवस्था आहे . या अवस्थेतील गणेशतत्त्व ब्रम्हस्वरूपाशी एकवटते . उपनिषदामध्ये व अथर्वशीर्षामध्ये उल्लेख झालेले हे ओंकाराचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनीही त्यांच्या गणेशस्तुती मध्ये असे केलेले आहे .

अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकर महामंडल। मस्तकाकारे।।
हे तिन्ही एकवटले। तेथे शब्दब्रम्ह कवळले।

अशाप्रकारे , गणक ऋषी , संत ज्ञानेश्वर व अनेक संतमाहात्म्यांनी गौरविलेले सर्व दिशातून रक्षण करणारे ज्ञानमयी असे सर्वांचे लाडके दैवत , समर्थ रामदासांच्या आरतीतून आपल्याला भेटते तेंव्हा ते अधिक सुकर व भक्तांच्या हृदयाच्या अधिक जवळ येते . दर्शनमात्रें मनकामना पूर्ती करणाऱ्या गणपती बाप्पाची साध्या सोप्या शब्दांत व चालीतून केलेली आळवणी आपल्या मनाचा ठाव घेते . सर्वांगाला सुंदर चंदन व शेंदूर उटी लावून केशराचा टिळा व शोभिवंत हिरेजडित मुकूट परिधान केलेला गौरीपुत्र आमचे रक्षण करो अशी समर्थांनी घातलेली आर्त साद आपल्याला गणपतीच्या चरणाशी एकरूप करते . शिवथरघळ वास्तव्याच्या वेळी समर्थानी जी गणेशस्तुती लिहिली ती आज आपल्या सर्वांच्या मनामनातून गुंजणारी गणपती ची आरती आहे . या समर्थांच्या आरती व गणेशभक्ती बद्दल इतिहासात नोंद देखील आहे .

समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!

समर्थ रामदास व छत्रपती शिवाजीराजे यांनी शिवथरघळ येथे भाद्रपद शुद्ध ४ ते माघ शुध्द ५ म्हणजेच गणेशजयंती पर्यंत पाच महिन्यांचा गणेशोत्सव करण्याची प्रथा सुरु केली . याचे पहिले वर्गणीदार स्वतः शिवराय आहेत . अशाप्रकारे स्वराज्यनिर्मितीनंतरचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव शिव - समर्थ यांनी साजरा केला . परंतु अगदी राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले ते आपल्या लोकमान्य टिळकांमुळे . पारतंत्र्यामुळे सामाजिक एकता ,शांतता व सलोख्याला छेद जात होता . म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्या साठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने लोकमान्यांनी टाकलेले पाऊल हे मनुष्यबळ संघटित करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले . यामागचे कारण असे कि , शिस्तबद्ध , आज्ञाधारक निष्ठावंतांचा समुदाय म्हणजे गण. या गणांचा अधिपती गणपती . यावरून हे स्पष्ट होते कि गणपती ही संघटनेची देवता आहे . या संघटित झालेल्या समाजाने साजरा करत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप कालपरत्वे बदलत गेले व अधिकाधिक वाढत गेले . गावोगावी तळागाळात पोहोचले . मंडळाच्या संख्येत भर पडत गेल्याने मंडपवाले , स्वछता कामगार , फुलवाले , धार्मिक दुकानदार , सजावटकार शिल्पकार अशा अनेकांना रोजगार मिळाला . इतकेच नाही तर गणपती ही ६४ कलांची देवता असल्याने अनेक गायक , नर्तक वक्ते , अभिनेते , मूर्तिकार , चित्रकार या व अशा कलाकार व त्यांच्या कलाविष्कारासाठी व्यासपीठ प्राप्त झाले . मंडळांकडून होत असलेल्या चॅरिटी व विधायक सामाजिक कार्यांमुळे गणरायावरची भक्ती मानवसेवेतही प्रकट होऊ लागली . अशाप्रकारे , आजचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप म्हणजेच आपल्या भारतीय परंपरेचा जाज्वल्य अभिमान आहे . शेवटी इतकंच वाटतं कि , श्रीगणेशा बरोबरच भक्तांनीही आपापल्या आयुष्यात व समाजात अत्यंत सुसंस्कृत अशा विधायक विचारांची व कार्याची प्राणप्रतिष्ठा करावी व उत्सवाचे १० दिवस आपापल्या चुकांचे ( बाकी विशाल उदर असलेला गणपती बाप्पा आपले अपराध पोटात घेत असतोच ) परिमार्जन करत नकारात्मक वृत्तीचे विसर्जन करावे . यामुळ वर्षभरातून हे गणेशोत्सवाचे दिवस आत्मिक व सामाजिक purification ची एक सुलभ प्रक्रिया म्हणून अनुभवास येतील .
( संदर्भ- उपनिषदांची काही पुस्तके)
-- तन्वी पुष्कर टापरे .